बालकांच्या सुरक्षिततेसाठी ग्राम बाल संरक्षण समित्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार; पोला येथे विशेष बैठकीत जनजागृतीवर भर

गडचिरोली जिल्ह्यातील पोला येथे ग्राम बाल संरक्षण समितीची विशेष बैठक घेऊन बालहक्क, बालसंरक्षण, बालविवाह प्रतिबंध, 'गुड टच-बॅड टच' जनजागृती आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी गावपातळीवर प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.

Jul 15, 2026 - 23:35
 0  3
बालकांच्या सुरक्षिततेसाठी ग्राम बाल संरक्षण समित्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार; पोला येथे विशेष बैठकीत जनजागृतीवर भर
ग्राम बाल संरक्षण समिती, गडचिरोली, पोला, बाल संरक्षण, बालहक्क

गडचिरोली | प्रतिनिधी : राजेंद्र किनाके 

गावातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि संरक्षणात्मक वातावरण मिळावे तसेच बालकांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समित्यांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा निर्धार पोला येथे आयोजित विशेष बैठकीत करण्यात आला. बैठकीत बालहक्क, बालसंरक्षण आणि गावपातळीवरील जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्यात आला.

'बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५' तसेच महाराष्ट्र शासनाच्या १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक महसुली गावात ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार १४ जुलै २०२६ रोजी मौजा पोला येथील अंगणवाडी केंद्रात ग्राम बाल संरक्षण समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी बाल संरक्षणाशी संबंधित कायदे, विविध शासकीय योजना, ग्राम बाल संरक्षण समितीच्या जबाबदाऱ्या तसेच गावपातळीवर प्रभावी संरक्षण व्यवस्था उभारण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीत बालकांवरील शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने अधिक सतर्क आणि संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गावात एखाद्या बालकासंदर्भात अत्याचार, शोषण किंवा अन्य गंभीर घटना घडल्यास संबंधित बालक किंवा पालकांनी कोणतीही भीती न बाळगता समितीच्या सदस्यांकडे गोपनीयरीत्या तक्रार नोंदवावी किंवा तात्काळ 'चाईल्ड हेल्पलाईन १०९८' वर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी केवळ अत्याचारानंतर मदत करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. गावामध्ये बालविवाह प्रतिबंध, 'गुड टच – बॅड टच', बालहक्क, बालसंरक्षण आणि सुरक्षित बालपण या विषयांवर नियमित जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे पुनर्गठन करून तिला अधिक सक्षम, संवेदनशील आणि प्रभावी बनविण्याचा निर्धार उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण बोरुले, आशा स्वयंसेविका सविता साखरे, मंदा शामकुळे, आरती निसाणे, अंगणवाडी सेविका छाया निखुरे, उज्ज्वला ढवळे, शोभा किनेकर, तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी नगीना कोठगले यांच्यासह ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत बालकांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी गावपातळीवर समन्वयाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0