तीन वर्षांनंतर अपहृत ८ वर्षीय मुलाचा शोध; एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी
मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने २०२३ मध्ये अपहरण झालेल्या ८ वर्षीय मुलाचा तब्बल तीन वर्षांनंतर शोध लावला. मुलाची सुखरूप पालकांकडे सुपूर्दगी करण्यात आली.
मुंबई | ब्यूरो: अनिल सावरे
मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने २०२३ मध्ये अपहरण झालेल्या ८ वर्षीय मुलाचा तब्बल तीन वर्षांनंतर शोध लावून त्याची सुखरूप पालकांकडे सुपूर्दगी केली आहे. अत्याधुनिक तांत्रिक तपास, विविध राज्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये अंधेरी पूर्व परिसरातून ८ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. मात्र मुलाचा ठावठिकाणा लागत नसल्याने विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान महाराष्ट्रासह परराज्यांतील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधण्यात आला. रेल्वे पोलीस, विविध स्वयंसेवी संस्था, बालकल्याण संस्थांशी संपर्क ठेवून बेपत्ता मुलाचा शोध सुरू ठेवण्यात आला. तसेच सोशल मीडियावरील माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचाही वापर करण्यात आला.
विशेष पथकाने सातत्याने पाठपुरावा करत अखेर मुलाचा ठावठिकाणा शोधून काढला. मुलाची ओळख निश्चित करून त्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाची त्याच्या पालकांशी भेट घडवून आणण्यात आली. तीन वर्षांनंतर मुलाला पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे अपहरण झालेल्या बालकाचा सुखरूप शोध लागला असून, नागरिकांनी अशा घटनांमध्ये तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0