महात्मा ज्योतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे राज्यभर विशेष अभियान; पशुपालकांसाठी जंतनाशक, वंध्यत्व निवारण शिबिरे
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभागाकडून जुलै २०२६ ते एप्रिल २०२७ या कालावधीत जंतनाशक मोहीम, वंध्यत्व निवारण शिबिरे आणि आधुनिक पशुपालनावरील तांत्रिक मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रतिनिधी | देवानंद शिंदे
पुणे : महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर पशुपालकांसाठी विविध विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पशुधनाचे आरोग्य सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि आधुनिक पशुपालनाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार २०२७ हे वर्ष 'महात्मा ज्योतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष' म्हणून साजरे करण्यात येत असून, त्यानिमित्ताने राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यभर जंतनाशक आणि वंध्यत्व निवारण शिबिरे
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान गायी आणि म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी विशेष तपासणी व उपचार शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
याशिवाय मार्च २०२७ ते एप्रिल २०२७ या कालावधीत आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, पशू आरोग्य व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पशुपालकांना होणार थेट लाभ
या अभियानामुळे पशुधनामधील जंतांचा प्रादुर्भाव कमी होऊन जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच नियमित वंध्यत्व निवारण उपचारांमुळे दुग्ध उत्पादनात वाढ होऊन पशुपालकांच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच कृषी विज्ञान केंद्रे, पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती पशुपालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी महत्त्वाची मोहीम
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या विशेष अभियानाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे, पशुधनाचे आरोग्य सुधारणे आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनविणे हा आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी राज्यातील सर्व पशुपालकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत आणि गावपातळीवर हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पशुपालकांनी अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय सेवांसाठी हेल्पलाइन १९६२ किंवा ब्लँड्स ॲप चॅटबॉट सेवा – ९०६३१४२२९९ वर संपर्क साधण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1