महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे ३ दिवसीय आंदोलन; बदली धोरणाविरोधात आझाद मैदानावर परिचारिकांचा आवाज
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे १८ ते २० मे दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या सरसकट प्रशासकीय बदली धोरणाविरोधात परिचारिकांनी आवाज उठवत ‘विनंती व तक्रार’ आधारित बदली प्रक्रिया लागू करण्याची मागणी केली.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या प्रशासकीय बदली धोरणाविरोधात संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या आंदोलनात राज्याध्यक्ष डॉ. मनिषा शिंदे, राज्य उपाध्यक्ष भिमराव चक्रे, कार्याध्यक्ष अरुण कदम, विक्रम पवार तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, १८, १९ आणि २० मे दरम्यान संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून आंदोलनादरम्यान कोणत्याही रुग्णसेवेत अडथळा निर्माण करण्यात आलेला नाही.
त्यांनी सांगितले की, संघटनेतील सुमारे ९० टक्के कर्मचारी महिला असून शासनाकडून होत असलेल्या सरसकट प्रशासकीय बदल्यांमुळे परिचारिकांच्या कौटुंबिक आणि मानसिक आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
“प्रशासकीय बदल्यांना आमचा विरोध नाही, मात्र बदली प्रक्रिया ‘विनंती व तक्रार’ या तत्त्वावर आधारित असावी,” अशी संघटनेची प्रमुख मागणी असल्याचे अरुण कदम यांनी स्पष्ट केले.
महिला परिचारिकांवर घर आणि कुटुंबाची जबाबदारी असते. अचानक बदली झाल्यास अतिरिक्त प्रवास, आर्थिक भार, मुलांच्या शिक्षणातील अडचणी तसेच कुटुंबापासून दूर राहण्याचा मानसिक ताण निर्माण होतो. याचा परिणाम परिचारिकांच्या आरोग्यावर आणि अप्रत्यक्षपणे रुग्णसेवेवर होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध ठेवण्यासाठी परिचारिकांचे मानसिक आणि सामाजिक स्थैर्य महत्त्वाचे असल्याचे संघटनेने अधोरेखित केले.
संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांची भेट घेतल्याची माहितीही देण्यात आली. या विषयावर पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
“शासनाकडून सकारात्मक आणि ठोस आश्वासन मिळाल्यास आंदोलन स्थगित करण्याचा विचार केला जाईल. मात्र मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही संघटनेने दिला आहे.
आंदोलनाचा आज शेवटचा दिवस असून वैद्यकीय शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर संघटनेची पुढील भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अरुण कदम यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
15
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
1
