१२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा उलगडा; ठाणे पोलिसांकडून तीन आरोपी अटकेत
ठाणे शहर पोलिसांनी १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली. आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून करून मृतदेह जंगलात फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-३, कल्याण यांनी तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. २०१४ मध्ये अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे जुन्या गुन्ह्यांच्या तपासात ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ साली मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण करून आरोपींनी पीडिताचा निर्घृण खून केल्याचे समोर आले.
आरोपींनी पीडिताला कार्यालयात नेऊन लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह स्वतःच्या वाहनातून नेऊन मुरबाड तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात फेकून देण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३ च्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तब्बल १२ वर्षांनंतर गुन्ह्याचा उलगडा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
