शेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मोबाईलचा शिक्षणासाठी योग्य वापर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि श्री गणेश चतुर्थी मंडळ, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य वापर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बुलढाणा | प्रतिनिधी (महेंद्र मिश्रा)
शेगाव येथे महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि श्री गणेश चतुर्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना चिन्मय स्कूलचे प्राचार्य प्रा. किशोर कुलकर्णी यांनी आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला तरी त्याचा वापर शिक्षणासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी योग्य पद्धतीने करण्याची गरज असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. जावडेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतींद्वारे नोकरी मिळविण्याची स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करून आपल्या विषयात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ब्राह्मण सभा, शेगावचे अध्यक्ष मोहन खानझोडे होते. यावेळी प्रविण धर्माधिकारी, विवेक सराफ, प्रविण धाराशिवकर, राजेंद्र पांडे, मनोज लंके, भूषण महाजन, अनघा सराफ, वर्षा महाजन, हेमा खानझोडे, वंदना धर्माधिकारी, सुनिता धाराशिवकर आणि अंजली पांडे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पिंगळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0