आरटीआय अर्ज मागे घेण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या चौकडीला कल्याण गुन्हे शाखेकडून अटक
डोंबिवली एमआयडीसीतील कथित निकृष्ट बांधकाम प्रकरणातील आरटीआय अर्ज मागे घेण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून २१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त.
ठाणे | प्रतिनिधी नरेश शिंदे
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकामामध्ये कथित निकृष्ट दर्जाचे काम झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला माहिती अधिकार (RTI) अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना कल्याण गुन्हे शाखा (घटक-३) पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई २ जुलै २०२६ रोजी करण्यात आली असून या प्रकरणामुळे खंडणीच्या माध्यमातून आरटीआय प्रक्रिया प्रभावित करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
प्रेस नोटनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीकडे वारंवार १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी करून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम, पाच मोबाईल फोन तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण २१ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून आणखी कुणाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ठाणे शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे खंडणीची मागणी होत असल्यास अथवा अशा घटनांची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2