बुलढाण्यात धक्कादायक घटना; चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात एका पित्याने चार लहान मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महेंद्र मिश्रा | बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा, दि. २८ : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भालांजन परिसरात एका पित्याने आपल्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या सामूहिक आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून समाजमन हादरून गेले आहे.
विजय मुसा किरडिया (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याने आपल्या पियुष (वय २), पूर्वी (वय ४), प्राची (वय ५) आणि प्रीत (वय ७) या चार मुलांना राजुरा शेतशिवारातील स्वतःच्या विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या आदल्या रात्री विजय किरडिया यांनी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी इस्लामपूर येथे सोडून दिल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेमुळे सातपुडा परिसरातील आदिवासी समाजासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, बदलती जीवनशैली आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे समाजात अशा घटना वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेण्याऐवजी शांत राहणे, संवाद साधणे आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहे
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
