शिवशाही व्यापारी संघाच्या तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी आकाश दत्तु शिंदे यांची नियुक्ती
शिवशाही व्यापारी संघाने तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत "तृतीयपंथी भगिनी आघाडी"ची स्थापना केली आहे. या आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी आकाश दत्तु शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड | दि. २१ मे २०२६
शिवशाही व्यापारी संघाने तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत "तृतीयपंथी भगिनी आघाडी"ची स्थापना केली असून या आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी श्री. आकाश दत्तु शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उषा माई कांबळे यांच्या समन्वयातून ही नवीन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. समाजातील तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आकाश दत्तु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे पुढे जाईल.
नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष आकाश दत्तु शिंदे यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तृतीयपंथी समाजाला रोजगार, व्यवसायासाठी कर्ज सुविधा, शासकीय योजनांचा लाभ आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
"सन्मानाने जगा, स्वाभिमानाने कमवा" हा संदेश घेऊन संघटना कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आघाडीची प्रमुख उद्दिष्टे
तृतीयपंथी भगिनींसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय संधी निर्माण करणे
बचत गट, ब्युटी पार्लर, शिवणकाम, फूड स्टॉल यांसारखे उपक्रम सुरू करणे
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आदी कागदपत्रांसाठी सहकार्य करणे
मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन सुविधा उपलब्ध करणे
सामाजिक भेदभावाविरोधात जनजागृती आणि कायदेशीर मदत उपलब्ध करणे
युवराज दाखले यांनी सांगितले की, सामाजिक समता आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या विचारातून संघटना कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथी भगिनी आघाडीचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
"सन्मान, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय" या मूल्यांच्या आधारावर तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य सुरू ठेवणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
