अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश
अल निनोमुळे मान्सूनवर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. पूर, दुष्काळ, पाणीटंचाई, आरोग्य आणि कृषी व्यवस्थापनासाठी विभागनिहाय सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
डॉ. विजय राठोड यांनी अल निनोमुळे मान्सूनवर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान विभागाने जूनमध्ये मुसळधार पावसाची, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि दुष्काळ या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणी नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य
जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा केवळ जूनपर्यंत नव्हे तर ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंपदा विभाग आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला धरणसाठा आणि भूजल पातळीचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा योजनांचे ऑडिट करून गळती रोखण्याचे आदेश देण्यात आले.
पूर आणि भूस्खलनाच्या धोक्याकडे विशेष लक्ष
जूनमधील संभाव्य अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपत्तीची वाट न पाहता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी उपसा आणि वापराचे सुसूत्रीकरण करण्याचे धोरण अवलंबण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
कृषी आणि पशुसंवर्धन विभागाला निर्देश
पावसातील संभाव्य मोठा खंड लक्षात घेऊन कृषी विभागाला शेतकऱ्यांसाठी तातडीने अॅडव्हायझरी जारी करण्याचे आदेश देण्यात आले. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शिफारस करणे तसेच पीक विम्याबाबत मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभाग यांना चारा टंचाई टाळण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश
उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात ओआरएस पाकिटे आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
उष्णतेपासून बचावासाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यावरही भर देण्यात आला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन हवामान अंदाज मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
या बैठकीला जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभागप्रमुख ऑनलाइन उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
