सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद" व्याख्यानात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी सर्वधर्मसमभाव हाच भारताचा खरा राष्ट्रवाद असल्याचे मत व्यक्त केले.

May 25, 2026 - 00:19
 0  3
सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे
विजय तांबे, महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद, पिंपरी पुणे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, पुणे (दि. २४ मे २०२६) : सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख असून हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी केले. भारत राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत जात, धर्म, भाषा, वर्ण आणि वंश यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले, तर दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी येथे रविवारी (दि. २४ मे) फुले, गांधी, नेहरू विचारमंच यांच्या वतीने आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद" या विषयावरील व्याख्यानमालेत विजय तांबे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विजय तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा पाया १८८५ मध्ये विविध धर्म, समाज आणि विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काँग्रेसची स्थापना केल्याने रचला गेला. हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुस्लीम, शीख अशा विविध समाजघटकांनी एकत्र येऊन भारतीय राष्ट्रवादाची बीजे रोवली.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशात एकात्मतेची भावना निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि दलित समाजाच्या स्वाभिमानासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. गांधी आणि आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद होते, मात्र राष्ट्रहितासाठी ते एकत्र आले आणि त्याचेच फलित म्हणजे भारतीय राज्यघटना होय.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ देताना विजय तांबे यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य चळवळ ही केवळ राजकीय नव्हती, तर ती अस्मिता, स्वाभिमान आणि एकात्मतेची लढाई होती. विविध समाजघटकांच्या सहभागामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला.

१९४७ साली भारत स्वतंत्र होत असताना तत्कालीन ब्रिटिश नेतृत्वाकडून भारत एकसंध राहू शकणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र भारतीय राज्यघटना, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विचारसरणीमुळे भारताने आपली एकात्मता टिकवून ठेवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे भारतीय राष्ट्रवाद सर्वसमावेशक आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचे विजय तांबे यांनी अधोरेखित केले.

घटना समितीच्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "घटना चांगली दिली आहे; पण ती चालवणारेही चांगले असले पाहिजेत," हा विचार मांडल्याचा उल्लेख करत त्यांनी भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सामाजिक सलोखा आणि संवैधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अक्षय शहरकर आणि केनिथ रेमी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दाहर मुजावर यांनी सूत्रसंचालन केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0