उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षक चौकातील उड्डाणपुलावर अपघात; खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रशासनावर आरोप

पिंपरीतील रक्षक चौक उड्डाणपुलावर उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी वाहन अपघाताची घटना घडली. पुलावरील तीव्र उतारामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात आला असून खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

May 25, 2026 - 02:53
 0  5
उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षक चौकातील उड्डाणपुलावर अपघात; खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रशासनावर आरोप
रक्षक चौक उड्डाणपूल, श्रीरंग बारणे, पिंपरी अपघात

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुलावरील तीव्र उतारामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा केला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाच्या उद्घाटनापूर्वी संबंधित ठिकाणाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी पुलावरील तीव्र उतार आणि संभाव्य सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भविष्यात अपघात होऊ शकतात, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप खासदार बारणे यांनी केला आहे. शुक्रवारी पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी हा अपघात घडल्याने सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुलावरील तीव्र उतारामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार पलटी झाली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, "या पुलातील तांत्रिक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी झालेला अपघात हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. भविष्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये. महापालिका प्रशासनाने पुलावरील उतारामध्ये आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी."

भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पुलाच्या रचनेचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0