यवतमाळात कामगारांचा एल्गार; हक्क आणि सन्मानासाठी कामगार हक्क परिषदेचा इशारा

यवतमाळमध्ये आयोजित कामगार हक्क परिषदेत सफाई कामगारांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवण्यात आला असून, मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

May 6, 2026 - 20:57
 0  4
यवतमाळात कामगारांचा एल्गार; हक्क आणि सन्मानासाठी कामगार हक्क परिषदेचा इशारा
यवतमाळ बातमी, कामगार आंदोलन, सफाई कामगार

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे 

यवतमाळ :

सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांच्या हक्कांसाठी यवतमाळमध्ये आयोजित कामगार हक्क परिषदेत जोरदार आवाज उठवण्यात आला. इक्वेरा फाउंडेशन आणि ‘पॅरा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत कामगार संघटनांनी शासन व प्रशासनाला थेट इशारा दिला.

मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कामगारांच्या प्रश्नांवर संताप

परिषदेची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आली. त्यानंतर २५ मार्च २०२६ रोजी कामावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कर्मचारी किशोर शेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या घटनेनंतरही कुटुंबीयांना नुकसानभरपाई न मिळाल्याने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.

ठेकेदारी पद्धतीवर टीका

परिषदेतील वक्त्यांनी सफाई कामगारांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकला.

विक्की प्रकाश बढेल यांनी ठेकेदारी पद्धतीवर जोरदार टीका करत सफाई सेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी केली.

डॉ. निरज वाघमारे यांनी सुरक्षा साधनांचा अभाव आणि किमान वेतनाच्या मुद्द्यांवर भाष्य करत कामगार आणि प्रशासन एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

हक्कांविषयी जागरूकता

कामगारांना त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यासाठी प्राची साळवे यांनी तयार केलेल्या ‘सफाई कामगारांचे हक्क’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत विविध शासकीय योजना व कायदेशीर संरक्षणाची माहिती देण्यात आली आहे.

मानवीयतेचा प्रत्यय

परिषदेदरम्यान दिवंगत किशोर शेंडे यांच्या पत्नी अर्चना शेंडे यांना मदत मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर उपस्थितांनी स्वेच्छा वर्गणी गोळा करून त्यांना आर्थिक सहाय्य दिले.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

या परिषदेत मंगला मून यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.

राहुल काळे यांनी ई-श्रम कार्डचे महत्त्व पटवून दिले.

तर इमरान देशमुख यांनी मोफत विधी सेवा आणि कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले.

ठराव व इशारा

परिषदेच्या समारोपावेळी किमान वेतनाची अंमलबजावणी, सुरक्षा साधनांची सक्ती आणि सुरक्षित कामाचे वातावरण यासाठी संयुक्त लढा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास कामगारांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी काजल सुखदेव आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची साळवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निरज वाघमारे यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0