मोफत बस योजना वादाच्या भोवऱ्यात; बीड–परभणीतील ग्राउंड रिपोर्टमधून वास्तव समोर
मराठवाड्यातील बीड आणि परभणी जिल्ह्यात मोफत बस योजनेमुळे वाढलेली गर्दी, प्रवाशांची गैरसोय आणि संभाव्य गैरवापर यावर चर्चा सुरू झाली आहे. चालक, वाहक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, योजनेचे फायदे आणि अडचणी दोन्ही स्पष्ट होत आहेत.
मराठवाडा ब्युरो : लक्ष्मण चौरे
मराठवाड्यासह राज्यभरात सुरू असलेल्या मोफत बस योजनेवर सध्या विविध स्तरांतून चर्चा रंगताना दिसत आहे. बीड व परभणी जिल्ह्यातील चालक, वाहक, विद्यार्थी आणि नागरिकांशी साधलेल्या संवादातून या योजनेचे सकारात्मक तसेच नकारात्मक पैलू समोर आले आहेत.
स्थानिक चालक व वाहकांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत बसमध्ये प्रचंड गर्दी वाढली असून अनेक वेळा प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. वाहक ए. व्ही. तादळे मॅडम आणि काही चालकांनी सांगितले की, ग्रामीण भागातील बससेवा आधीच मर्यादित असताना मोफत योजनेमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
काही नागरिकांनीही कबूल केले की, किरकोळ कारणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी योजनेचा गैरवापर होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नागरिकांच्या मते, “गरज नसतानाही अनेक जण वारंवार प्रवास करत असल्याने बस नेहमीच भरलेल्या दिसतात. याचा फटका कामानिमित्त प्रवास करणारे सामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि गरजू प्रवाशांना बसत आहे.”
काही प्रवाशांनी अशीही तक्रार व्यक्त केली की, बसमध्ये जागा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना व कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळ उभ्याने प्रवास करावा लागतो. काही ग्रामीण भागांत बसची संख्या अपुरी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अनेक वयोवृद्ध व गरजू नागरिकांनी या योजनेचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, दवाखाना, शासकीय कामे, बाजारपेठ तसेच इतर आवश्यक प्रवासासाठी ही योजना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोफत प्रवास सुविधा महत्त्वाची असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे — “जर गावपातळीवर दवाखाने, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा सक्षम नसतील, तर केवळ मोफत प्रवास देणे हा विकासाचा पुरेसा मापदंड ठरू शकतो का?”
तज्ज्ञांच्या मते, मोफत बस योजना ही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त असली तरी वाढती गर्दी, बसची कमतरता आणि संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी योग्य नियोजन, अतिरिक्त बससेवा आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा आवश्यक आहे. अन्यथा, या योजनेचा सर्वाधिक फटका गरजू प्रवाशांनाच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

