कुंभमेळा कामांना अधिक गती देणार; त्र्यंबकेश्वरातून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेत कुंभमेळा कामांना अधिक गती देण्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ झाला.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली कामे समाधानकारक असून त्यांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करून देवस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. त्र्यंबकेश्वर येथील विकासकामांच्या संदर्भात विविध आखाड्यांच्या महंतांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
जलसंवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ही जलयात्रा २५ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, युवराज यशवंतराव होळकर, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महापौर हिमगौरी आडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0