भोंदू अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नकार; न्यायालयीन कोठडी कायम, राज्यभर १४ भोंदू बाबांवर गुन्हे

नाशिक न्यायालयाने भोंदू अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी कायम ठेवली. दरम्यान, खरात प्रकरणानंतर राज्यभर एका महिन्यात १४ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली आहे.

Apr 30, 2026 - 20:58
Apr 30, 2026 - 22:04
 0  14
भोंदू अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नकार; न्यायालयीन कोठडी कायम, राज्यभर १४ भोंदू बाबांवर गुन्हे
भोंदू अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नकार; न्यायालयीन कोठडी कायम

नाशिक प्रतिनिधी : भोंदू अशोक खरात याला आठव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्यास नाशिक न्यायालयाने नकार दिला असून त्याची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष पोलीस पथकाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

विशेष पोलीस पथकाने अशोक खरात याला दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयासमोर हजर केले होते. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर न करता न्यायालयीन कोठडी कायम ठेवली.

४२ दिवस चौकशी, तरीही पहिल्यांदाच नकार

अशोक खरातविरोधातील विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत प्रत्येकवेळी पोलीस कोठडी घेत सुमारे ४२ दिवस चौकशी केली होती. मात्र आठव्या गुन्ह्यात प्रथमच न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारल्याने तपास यंत्रणेला धक्का बसला आहे.

दरम्यान, नव्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी विशेष पथक प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे.

खरात प्रकरणाचा राज्यभर परिणाम

अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभर अनेक पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे महिलांमध्ये लढण्याचे धैर्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

एका महिन्यात १४ भोंदू बाबांवर गुन्हे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात राज्यभर १४ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

अंनिसचे आवाहन

राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, ॲड. रंजना गवांदे आणि विष्णू लोणारे यांनी पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

“खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे.”

— संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस

गेल्या महिन्यात दाखल झालेले गुन्हे

अशोक कुमार खरात – नाशिक

राजेंद्र गडगे – संगमनेर, अहिल्यानगर

चेतन सुनील माळी – मूर्तिजापूर, अकोला

पंकज देवराम घोलप – येडगाव, पुणे

मनोहर मामा भोसले – कुरुडवाडी, सोलापूर

नाना बर्डे – आळे फाटा, पुणे

ऋषिकेश वैद्य – वसई

अल्ताफ रईस खान – मालाड, मुंबई

रिधम पांचाळ – मालाड, मुंबई

गणेश शिंदे – श्रीरामपूर, अहिल्यानगर

अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा – नवी मुंबई

विठोबा वाल्मीक जाट – सातपूर, नाशिक

किसन तळपे – मंदोशी, खेड

महेशगिरी (महेश काकडे) – निफाड, नाशिक

अंधश्रद्धा विरोधी कायद्याची पुन्हा चर्चा

या घटनांमुळे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1