वेदपाठशाळांना सरकारी अनुदान व स्वतंत्र वैदिक बोर्डाची स्थापना करा; वेदाचार्य रवींद्र पैठणे यांची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्रातील वेदपाठशाळांना सरकारी अनुदान देण्यात यावे आणि स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य वैदिक बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणी वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. वेदविद्येच्या संवर्धनासाठी शासकीय पाठबळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Jun 8, 2026 - 22:39
 0  12
वेदपाठशाळांना सरकारी अनुदान व स्वतंत्र वैदिक बोर्डाची स्थापना करा; वेदाचार्य रवींद्र पैठणे यांची राज्यपालांकडे मागणी
वेदपाठशाळांना अनुदान व वैदिक बोर्डाची मागणी; राज्यपालांना वेदाचार्य रवींद्र पैठणे यांचे निवेदन

नाशिक | ब्युरो

महाराष्ट्रातील वेदपाठशाळांना तातडीने सरकारी अनुदान मंजूर करण्यात यावे तसेच राज्यात स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य वैदिक बोर्ड’ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

९ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या वेदसंमेलन व वैदिक सन्मान सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वेदविद्येच्या संवर्धनासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनईपी) भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे. वेदविद्या ही भारतीय संस्कृतीचा मूलाधार असून तिचे संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या वेदपाठशाळांना शासनाचे आर्थिक पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे.

गुरु-शिष्य परंपरेतून वेदांचे संवर्धन

वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी सांगितले की, अनेक संकटांचा सामना करत वैदिक विद्वानांनी आपले संपूर्ण आयुष्य वेदसंवर्धनासाठी समर्पित केले आहे. शतकानुशतके गुरु-शिष्य परंपरेतून वेदांचे जतन आणि संवर्धन होत आले असून आजही महाराष्ट्रातील अनेक वेदपाठशाळा केवळ लोकाश्रय आणि समाजाच्या सहकार्यावर चालत आहेत.

शासनाच्या मदतीमुळे मिळेल बळ

आर्थिक मर्यादांमुळे अनेक वेदपाठशाळांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे आहे. शासनाचे आर्थिक साहाय्य मिळाल्यास वेदविद्येचा अधिक व्यापक प्रसार करता येईल. तसेच नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना वेदाध्ययनासाठी प्रोत्साहन मिळेल आणि या ज्ञानपरंपरेचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख मागण्या

निवेदनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

महाराष्ट्रातील वेदपाठशाळांना नियमित शासकीय अनुदान मंजूर करावे.

वेदांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मासिक शिष्यवृत्ती योजना सुरू करावी.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत उज्जैन येथे कार्यरत ‘महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान’च्या धर्तीवर स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य वैदिक बोर्ड’ स्थापन करावा.

वेदविद्येच्या अभ्यासक्रमांना अधिकृत मान्यता व संस्थात्मक बळ द्यावे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ हा सार्वभौम संदेश जगाला देणाऱ्या भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वेदप्रेमी आणि वैदिक विद्वानांनी व्यक्त केली आहे.

या भेटीदरम्यान महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे सहयोगी सुहास बेलापुरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमित आपटे, विश्व हिंदू परिषदेच्या शुभांगी जोशी तसेच मीनल पैठणे उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0