रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करा; कामांना गती देण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, मात्र विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून प्रलंबित कामांना गती देणे आवश्यक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या बैठकीत पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यटक सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेण्यात आला.
मुंबई, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून महिनाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रायगड किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, दिशादर्शक फलक (सायनेज), पर्यटकांसाठी सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे विकासकामे रखडू नयेत. रायगडसारख्या जागतिक महत्त्वाच्या वारसा स्थळासाठी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे आणि मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढविणे अत्यावश्यक आहे.
रायगड किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी महत्त्वाचा उमेदवार असल्यामुळे सर्व विकासकामे जागतिक निकषांनुसारच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरातत्त्व विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग, जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल साधावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रलंबित कामांची विभागणी, अडचणी, जबाबदाऱ्या आणि पुढील कृती आराखडा तयार करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0