नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त; भाववाढीसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाले असून निफाड तालुक्यात आंदोलन तीव्र झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या कांदा निर्यात धोरणावर टीका करत 26 मे रोजी मुंबई-आग्रा महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

May 19, 2026 - 15:56
May 19, 2026 - 16:01
 0  3
नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त; भाववाढीसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
नाशिक कांदा आंदोलन, कांदा उत्पादक शेतकरी, कांद्याचे दर,

नाशिक ब्युरो | दि. 18 मे 2026

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू असून निफाड तालुक्यात शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून आक्रमक पवित्र्यात आंदोलन करत आहेत.

कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या प्रति किलो 12 रुपये 35 पैसे खरेदी दरावरही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी लासलगाव येथे कांद्याच्या माळा घालून आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

रोहित पवार म्हणाले की, “गेल्या आठ दिवसांपासून निफाड तालुक्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.”

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि निर्यात धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “श्रीलंका, बांगलादेश आणि इराण यांसारख्या देशांबरोबर योग्य व्यापार संबंध टिकवण्यात सरकार अपयशी ठरले. परिणामी कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आणि त्याचा थेट फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला,” असा आरोप त्यांनी केला.

कांदा निर्यात धोरणातील सातत्याच्या अभावामुळे भारतावरील परदेशी बाजारपेठांचा विश्वास कमी झाल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, “कधी निर्यात बंद तर कधी सुरू अशा निर्णयांमुळे व्यापारी आणि परदेशी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.”

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास 26 मे रोजी सकाळी 9 वाजता चांदवड येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असून मुंबई-आग्रा महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

सध्या कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0