अजित पवार यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; वहिनींचा निर्णय पक्षहिताचा – सलीम सारंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी विधान परिषद उमेदवारीबाबत घेतलेला निर्णय पक्षहिताचा असल्याचे सांगितले. पक्षनिष्ठा, एकजूट आणि नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विधान परिषद उमेदवारीबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे पक्षहिताचा असल्याचे म्हटले आहे. आम्ही कायम वहिनींसोबत खंबीरपणे उभे आहोत आणि अजित पवार यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी कार्य
सारंग म्हणाले की, अजित पवार यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांना जोडत, उभे करत आणि संकटात साथ देत पक्ष अधिक सक्षम करण्याचे काम केले. त्यांच्या विचारांनुसार पक्ष एकसंघ ठेवणे हीच खरी गरज आहे.
पदासाठी असंतोष खेदजनक
काही नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, पक्षाने ज्यांना सर्व काही दिले, पदे दिली, संधी दिली, तेच आज पदाच्या अपेक्षेने असंतोष व्यक्त करताना दिसत आहेत. ही बाब खेदजनक आहे.
“पदे ही बंडखोरीतून मिळत नाहीत; ती जनतेचा विश्वास जिंकून, कामातून पात्रता सिद्ध करून आणि पक्षसंघटना मजबूत करत मिळतात,” असे त्यांनी सांगितले.
व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा
आज गरज आहे ती वैयक्तिक अपेक्षांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याची, असे सारंग म्हणाले. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पदापेक्षा विचार मोठा असतो, असे त्यांनी नमूद केले.
हीच खरी आदरांजली
अजित पवार यांच्या शिकवणीनुसार पक्ष एकसंघ ठेवणे आणि नेतृत्वासोबत ठामपणे उभे राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही सलीम सारंग यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0