प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपा; सेवा हक्क दिनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जपण्याचे आवाहन करत उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
कोल्हापूर : प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपणे ही काळाची गरज असून नागरिकांच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणे हे प्रत्येक शासकीय घटकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित ‘सेवा हक्क दिन’ समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांना जास्तीत जास्त सेवा कमीत कमी कागदपत्रांत आणि अधिक पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
समारंभात सेवा वितरणात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपविभागीय अधिकारी करवीर मोसमी चौगुले, तहसीलदार सर्वसाधारण नेताजी सगट, तहसीलदार गडहिंग्लज ऋषिकेश शेळके, नायब तहसीलदार पन्हाळा संजय वळवी, जिल्हा व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) जयंत पाटील, वरिष्ठ अभियंता गजानन दीपंकर, जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार केंद्र संदीप पाटील, सेवा केंद्र प्रमुख परशुराम सरपाले, प्रशांत सिंहासने आणि जुबेर मुजावर यांचा समावेश होता.
उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी लोकसेवा हक्क कायद्यातील विविध तरतुदी सादरीकरणाद्वारे समजावून सांगितल्या. तसेच उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यपालनाची शपथ देण्यात आली.
डिजिटल माध्यमांचा वापर करून जलद, पारदर्शक आणि विहित वेळेत सेवा मिळाव्यात, हा सेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नाथाजी सगट यांनी केले. सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले. उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले आणि तहसीलदार तेजस्विनी पाटील यावेळी उपस्थित होत्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0