कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देशपातळीवर आणणार – मंत्री शंभूराज देसाई
कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी एमटीडीसीमार्फत ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर येथे आधुनिक पर्यटन सुविधा उभारल्या जात असून यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
प्रतिनिधी | कोल्हापूर
ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर येथे आधुनिक पर्यटन सुविधा उभारणार; कोल्हापूरला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा संकल्प
कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराला पर्यटनाच्या क्षेत्रात देशपातळीवर विशेष स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन आणि पर्यटन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित पर्यटन व खनिकर्म विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. विजय राठोड, डॉ. जॅसमिन, डॉ. राजेंद्र भारूड आणि गजानन गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले की, कोल्हापूरला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले असून या नैसर्गिक संपत्तीचा पर्यटन विकासासाठी प्रभावी वापर करता येऊ शकतो. याच दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा किल्ला आणि दाजीपूर अभयारण्य येथे व्हीव्हीआयपींपासून सर्वसामान्य पर्यटकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा दर्जेदार रिसॉर्ट्स आणि कॉटेज उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पन्हाळा विकासासाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन
पन्हाळा परिसरातील रिकाम्या जागांचे सुशोभीकरण आणि लँडस्केपिंग करून पर्यटनासाठी आकर्षक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या. पन्हाळा येथे सध्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
"या सर्व प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामांमुळे कोल्हापूरच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल," असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटनासोबत खनिकर्म विभागाचाही आढावा
बैठकीदरम्यान मंत्री देसाई यांनी जिल्ह्यात खनिज उत्खननाच्या संधींबाबतही माहिती घेतली. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी जिल्ह्यात सध्या दोन खाणी कार्यरत असून बावनगुण खनिजाचे खानपट्टे मंजूर असल्याची माहिती दिली.
क-वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ३२२ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून १२ प्रमुख यंत्रणांमार्फत ही कामे राबविण्यात येत आहेत.
या बैठकीस डॉ. संपत खिलारी, मोसमी चौगुले, तुषार बुरुड, विक्रम देशमुख, शिवराज नाईकवाडे, भारत लांघी, हनुमंत हेडे तसेच चेतनकुमार माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे जिल्ह्याला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

