बदलत्या गुन्हेगारी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ च्या समारोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाने सायबर व आर्थिक गुन्ह्यांसारख्या बदलत्या आव्हानांना सज्जतेने सामोरे जाण्याची गरज व्यक्त केली. मुंबई संघाने पुरुष व महिला गटात उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला.
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि आधुनिक गुन्हेगारीच्या नव्या आव्हानांना सज्जतेने सामोरे जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कलिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ च्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोईर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वाधिक सक्षम आणि व्यावसायिक दलांपैकी एक आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीतही पोलीस दलाची मोठी भूमिका आहे.
ते पुढे म्हणाले की, पोलीस दलाचे दैनंदिन काम अत्यंत आव्हानात्मक असते. अशा क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा फिटनेस, शिस्त, कौशल्य आणि संघभावना वाढीस लागते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल सातत्याने उज्ज्वल कामगिरी करत आहे.
अत्यंत उष्ण वातावरणातही स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई पोलीस आणि आयोजकांचे कौतुक केले. खेळामध्ये जिंकणे-हरणे यापेक्षा खेळाडूवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धांमध्ये यजमान मुंबई संघाने पुरुष व महिला गटात उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
१०० मीटर महिला स्पर्धेत पुणे शहरच्या निकिता संदीप खताळ आणि १०० मीटर पुरुष स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या चैतन्य संतोष मरडे यांनी नवे विक्रम प्रस्थापित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातील खेळाडूंनी दिमाखदार संचलन सादर केले. पोलीस बँडच्या सुरेल संगीताने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0