स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाख नागरिकांना लाभ; राज्याच्या विकासात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचा ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमांचे कौतुक करत राज्याच्या विकासात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

Jun 15, 2026 - 01:06
 0  4
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाख नागरिकांना लाभ; राज्याच्या विकासात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्टँडर्ड चार्टर्ड बँक, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विकास, जलसुरक्षा,

मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे 

मुंबई, दि. १४ जून : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असून जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या क्षेत्रात बँकेने केलेले योगदान राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक आहे.

३० जिल्ह्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी

बँकेचे सामाजिक उपक्रम महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले असून राज्यातील सुमारे ७५ टक्के आकांक्षी जिल्ह्यांपर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे. या उपक्रमांच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असून जलसंधारण, आरोग्य आणि उपजीविका वृद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे.

जलसुरक्षेसाठी मोठे योगदान

जलसुरक्षा उपक्रमांतर्गत राज्यात १.०६ अब्ज लिटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएम उभारण्यात आले असून मराठवाडा आणि विदर्भासह २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे.

तसेच ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन उपाययोजना आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सात लाख वृक्षांची लागवड हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

कौशल्य विकासातून रोजगाराला चालना

रोजगारक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत ६,५९८ युवकांना कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे.

इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले आहे.

या कार्यक्रमातील ६१ टक्के लाभार्थी महिला असून ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना विशेष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. याशिवाय ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांनाही मदत करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

बँकेच्या ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ या प्रमुख उपक्रमांतर्गत राज्यातील ४ लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.

राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रे स्थापन करण्यात आली असून ही केंद्रे आता स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे १.६ कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होत आहे. जिल्हा अंधत्व नियंत्रण संस्था आणि आयुष्मान भारत यांसारख्या शासकीय योजनांशी समन्वय साधून या उपक्रमांचा विस्तार करण्यात आला आहे.

सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे

स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारतच्या शाश्वतता विभागाच्या प्रमुख करुणा भाटिया यांनी सांगितले की, वंचित आणि दुर्लक्षित समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँक कटिबद्ध असून महाराष्ट्रातील जलसुरक्षा, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील उपक्रम ही दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे उपक्रम शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला गती देणारे ठरत आहेत. शासन आणि उद्योग क्षेत्रातील अशा भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1