जनगणना २०२७ साठी नागरिकांनी ‘एसई आयडी’ गणनाकारांना द्यावा; बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
जनगणना २०२७ अंतर्गत ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सुरू असून स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना मिळालेला ‘एसई आयडी’ गणनाकारांना देणे आवश्यक असल्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
मुंबई, दि. २२ मे २०२६ : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जनगणना अधिकारी अश्विनी भिडे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला ‘एसई आयडी’ (SE ID) नियुक्त गणनाकारांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देत असून ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रियेअंतर्गत नागरिकांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम नोंदणी प्रक्रिया पार पडत आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी दिलेला ‘एसई आयडी’ गणनाकारांकडून तपासल्यानंतर आणि माहितीची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरच गृहगणना प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे.
स्व-गणना पोर्टलवर नागरिकांनी भरलेली माहिती अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रणालीद्वारे ‘एनक्रिप्टेड’ स्वरूपात सुरक्षित सरकारी सर्व्हरवर संग्रहित केली जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी अफवा, बनावट संकेतस्थळे किंवा चुकीच्या माहितीपासून सावध राहावे तसेच केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी नागरिकांनी गणनाकारांना आवश्यक माहिती आणि सहकार्य द्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0