जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १ मेपासून; ‘स्वगणना’साठी नागरिकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
भारतीय जनगणना २०२७ च्या डिजिटल प्रक्रियेचा पहिला टप्पा १ मेपासून सुरू होत असून नागरिकांना ‘स्वगणना’ पोर्टलवर स्वतःची माहिती भरता येणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर, दि. ३० : भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला उद्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरुवात होत आहे. या अंतर्गत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरता येण्यासाठी ‘स्वगणना’ पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
१ मे ते १५ मे दरम्यान माहिती भरण्याची संधी
या मोहिमेत नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत अधिकृत पोर्टलवर स्वतःची माहिती भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि गृहनिर्माण या विषयावर माहिती संकलित केली जाणार आहे.
यामध्ये घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबाची मालमत्ता यांसारखी संख्यात्मक माहिती गोळा केली जाणार आहे.
प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि मोफत
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क, सुरक्षित आणि गोपनीय आहे. नागरिकांनी कोणत्याही फसव्या लिंकवर विश्वास ठेवू नये तसेच ओटीपी कोणालाही शेअर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
१६ मेपासून प्रगणक घरपोच भेटी
महाराष्ट्रात १६ मेपासून प्रगणक मोबाईल ॲपसह घराघरांत भेट देणार आहेत. मात्र त्यापूर्वी १५ मेपर्यंत नागरिकांनी स्वगणना पोर्टलचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
यामुळे प्रगणकांचा वेळ वाचणार असून माहिती संकलन अधिक वेगाने होणार आहे.
भविष्यातील नियोजनासाठी महत्त्वाची जनगणना
ही डिजिटल जनगणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून भविष्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि विकास नियोजनाचा आधारस्तंभ ठरणार आहे.
त्यामुळे सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0