महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे व गडकिल्ल्यांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मंजुरी

राज्यातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. भाविक आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.

May 18, 2026 - 23:09
 0  4
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे व गडकिल्ल्यांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मंजुरी
देवेंद्र फडणवीस, तीर्थक्षेत्र विकास, महाराष्ट्र गडकिल्ले, भीमाशंकर विकास,

मुंबई, दि. १८ :

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने मोठा निर्णय घेत विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी तब्बल ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करून भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा, आरोग्यसेवा आणि सुयोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी १७२ कोटींची तरतूद

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या सर्वांगीण विकासासाठी १७२.२२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये अत्याधुनिक बसस्थानक, पार्किंग, रस्ते रुंदीकरण, पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रोपवे सुविधा आणि पर्यटन विकासाच्या कामांचा समावेश आहे.

संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धनासाठी ४१ कोटी

देहू येथील संत तुकाराम महाराज जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर आणि भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धनासाठी ४१.७१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सुशोभीकरण, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, माहिती केंद्र आणि हरित क्षेत्र संवर्धनावर भर देण्यात आला आहे.

किल्ले अजिंक्यतारासाठी १३४.८० कोटी

सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराच्या जतन व संवर्धनासाठी १३४.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुरुज संवर्धन, लँडस्केपिंग, प्रेक्षक गॅलरी, लटकता पूल आणि पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

संगम माहुली समाधीस्थळ विकासासाठी १३३ कोटी

महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परिसरात झुलता पूल, व्ह्यूइंग गॅलरी आणि पर्यटन सुविधा उभारण्यात येणार आहेत.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासाठी २१० कोटी

वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी २१०.४५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा मंजूर करण्यात आला. भक्त निवास, प्रतीक्षागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फंक्शन हॉल आणि बायपास रस्त्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

परळी वैजनाथ मंदिर विकासासाठी ३०१ कोटी

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल रांग व्यवस्था, अन्नछत्र, योग केंद्र, घाट, सायकल ट्रॅक, सीसीटीव्ही व्यवस्था, शिवमूर्ती, संग्रहालय आणि लेझर शो यांसारख्या कामांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0