अपहरणासह जबरी चोरी प्रकरण उघड; ६ आरोपींना ६ तासांत अटक
मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी अपहरण व जबरी चोरी प्रकरणात ६ आरोपींना अवघ्या ६ तासांत अटक करत २२.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबई ब्यूरो - अनिल सावरे
अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपहरणासह जबरी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या ६ तासांत छडा लावत ६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून सुमारे २२ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदार श्रवण लक्ष्मण रावल (वय ४५, विरार पश्चिम) हे अँटॉप हिल परिसरात जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील सुमारे ३२.५० लाख रुपये काढून घेत त्यांना घाटकोपर परिसरात सोडून दिले, अशी तक्रार नोंदविण्यात आली होती.
या घटनेनंतर अँटॉप हिल पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान एका संघटित टोळीचा सहभाग समोर आला. पोलिसांनी जलद कारवाई करत मुंबई व गोवा येथून ६ आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल गायकवाड, इरफान अली अहमद अली खान, विवेक काकडे, संतोष मालेकर, रुपेश चंद्रकांत पाटील आणि मोहम्मद रिजवान अन्सार यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपी नालासोपारा व गोवा येथे लपून बसले होते.
या प्रकरणात आरोपींकडून एकूण २२,६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली असून तपास पथकाने अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0