दिल्लीत ‘कोकण हापूस’चा सुगंध; महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे उद्घाटन
महाराष्ट्र दिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे उद्घाटन निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते झाले. दिल्लीकरांसाठी जीआय टॅग अस्सल हापूस उपलब्ध करण्यात आला आहे.
नवी दिल्ली, दि. १ मे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले.
यावेळी आर. विमला म्हणाल्या की, दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असले तरी तो आंबा खरोखरच देवगड किंवा रत्नागिरीचा अस्सल हापूस आहे का, याबाबत ग्राहकांना खात्री नसते. हीच बाब लक्षात घेऊन जी.आय. टॅग मानांकित कोकणातील अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अस्सल हापूसची खात्री
उद्घाटनानंतर महोत्सवातील स्टॉल्सची पाहणी करताना त्यांनी सांगितले की, कोकणच्या मातीत पिकलेला दर्जेदार हापूस ग्राहकांना मिळेल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना अस्सल हापूसची खरी चव अनुभवता येणार आहे.
दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीमती आर. विमला यांनी दिल्लीकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. हा प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि अधिक दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0