शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज – बसवराज मास्तोळी
कोल्हापूर येथे “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.
कोल्हापूर | दि. २५ शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठे आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि प्रकल्प संचालक आत्मा (ATMA), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रम विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात पार पडला.
कृषी योजनांचे सादरीकरण
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कृषी विभागाच्या विविध योजना आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे सविस्तर सादरीकरण केले.
मास्तोळी यांनी कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ, आत्मा आणि उमेद यांसारख्या संस्थांनी भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी असे संयुक्त कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
याच सत्रात यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्र. संचालक डॉ. नितीन माळी यांनी ग्रामीण विकास शिक्षणातील संधींचा आढावा घेतला.
पुस्तकाचे प्रकाशन
कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘भरड धान्यांचा चमत्कार : स्थानिक धान्ये आणि आधुनिक आश्चर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
हे पुस्तक शितल पाटील, डॉ. स्नेहल खांडेकर, डॉ. इराण्णा उडचान, प्रा. डॉ. पी. डी. पाटील आणि सिद्धार्थजी शिंदे यांनी लिहिले आहे.
यावेळी डॉ. इराण्णा उडचान यांनी पुस्तकामागील संकल्पना स्पष्ट केली.
कृषी क्षेत्रावर मार्गदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेशजी कुलकर्णी यांनी कृषी क्षेत्राची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल आणि राष्ट्रनिर्मितीतील कृषी क्षेत्राचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
तज्ञांचे मार्गदर्शन
कार्यशाळेतील तांत्रिक सत्रांमध्ये विविध तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यात:
सिद्धार्थ शिंदे – व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ
डॉ. विद्यासागर गेडाम – प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र
डॉ. जयवंत जगताप – केव्हीके तळसंदे
डॉ. संकेत मोरे – आयसीएआर पुणे
डॉ. के. व्ही. मालशे – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये
नामदेव परीट – कृषी उपसंचालक
डॉ. वावरे – केव्हीके कणेरी
डॉ. शांतीकुमार पाटील – शास्त्रज्ञ
विविध विषयांवर माहिती
या सत्रांमध्ये ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला, मसाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय कर्ब वाढ, मित्र कीटक, सेंद्रिय कीटकनाशके, कुक्कुटपालन, अन्नप्रक्रिया उद्योग, PMFME योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील (कोल्हापूर), किरण पाटील (गडहिंग्लज) तसेच सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप प्रभारी कुलगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शेवटी डॉ. उर्मिला दशवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0