कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीचे आंदोलन दिशाभूल करणारे; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – भाजप अध्यक्ष सुनील केदार

कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीने केलेले आंदोलन दिशाभूल करणारे असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी उपाययोजना केल्याचेही त्यांनी म्हटले.

May 27, 2026 - 01:02
 0  32
कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीचे आंदोलन दिशाभूल करणारे; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – भाजप अध्यक्ष सुनील केदार
कांदा प्रश्न, सुनील केदार, भाजप नाशिक,

नाशिक ब्यूरो:

नाशिक : कांदा प्रश्नावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलेले आंदोलन दिशाभूल करणारे असून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटे कथानक उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे.

सुनील केदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नाफेडमार्फत थेट कांदा खरेदी प्रक्रिया सुरू केली असून कांद्याला १५ रुपये ८० पैसे प्रतिकिलो दर निश्चित करण्यात आला आहे. यामुळे यापूर्वी कमी दरात कांदा विकावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत प्रति क्विंटल १ हजार ५८० रुपयांचा दर जाहीर केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांदवड येथे आंदोलन करून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात खोटे कथानक उभे करण्यात आले होते, असा दावा करत त्यांनी आता कांदा प्रश्नावरही तसाच प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले.

महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या वक्तव्यांवर टीका करत सुनील केदार यांनी आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेली भाषा अयोग्य असल्याचे म्हटले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत त्यांनी केलेल्या दाव्यांचा संदर्भ देत राज्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

सुनील केदार यांनी पुढे म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असून कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. विरोधी पक्षांनी केवळ विरोधासाठी आंदोलन न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, कांदा दराचा मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला असून शेतकरी, व्यापारी आणि राजकीय पक्षांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0