सर्वसामान्य माणूस हाच ‘विठ्ठल’; टेक-वारी 2.0 मधून नागरिक-केंद्रित प्रशासनाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टेक-वारी 2.0’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनाला सुलभ करण्यासाठी व्हावा, यावर भर दिला. नागरिक-केंद्रित प्रशासन, एआयचा वापर, डिजिटल गव्हर्नन्स आणि आत्मविकास यावर आधारित हा उपक्रम राज्याच्या प्रशासनाला नवे बळ देणार आहे.

May 4, 2026 - 19:43
 0  3
सर्वसामान्य माणूस हाच ‘विठ्ठल’; टेक-वारी 2.0 मधून नागरिक-केंद्रित प्रशासनाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टेक वारी 2.0, देवेंद्र फडणवीस, नागरिक-केंद्रित प्रशासन

मुंबई, दि. ४ : “सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक-वारी हा उपक्रम आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे हा आहे. प्रशासनात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि वेग वाढविणे आवश्यक आहे. ‘टेक-वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविण्यावर भर दिला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, आजच्या बदलत्या युगात तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत असून त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही भविष्यातील साक्षरतेची नवी व्याख्या ठरणार आहे. पुढील हजार दिवसांत कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःची कौशल्ये अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, ‘टेक-वारी 2.0’ हा केवळ तांत्रिक प्रशिक्षणाचा उपक्रम नसून आत्मविकास आणि आधुनिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सुलभ झाला असून सेवा वितरण अधिक प्रभावी होत आहे.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, या उपक्रमात तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्यावरही भर देण्यात येत आहे. एआय, सायबर सुरक्षा, भाषा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसोबतच योग, संगीत आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या प्रशिक्षण सप्ताहात सुमारे ६ हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत असून राज्यभरातील ९ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी सत्रांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. डिजिटल गव्हर्नन्स, डीपीडीपी कायदा, क्वांटम कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह एआय आणि सायबर सुरक्षेसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत.

कार्यक्रमात ‘एआय एजंट वासुदेव’ या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0