नोकरीत शिस्तबद्ध सर्जनशीलतेचे महत्त्व; महिला अधिकाऱ्यांचा परिसंवादात अनुभव मांडला
नवी दिल्ली येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनात महिला अधिकाऱ्यांनी नोकरीतील शिस्त आणि सर्जनशीलतेचा समतोल यावर अनुभव मांडले. प्रेरणादायी परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
नवी दिल्ली | दि. ११ :
प्रशासकीय सेवेतील शिस्त आणि साहित्यातील सर्जनशीलता यांचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत महिला अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित परिसंवादात व्यक्त केले.
महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६’ अंतर्गत ‘अडथळ्यांपलीकडचे कर्तृत्व: शासकीय सेवेतील महिला कर्तृत्वाची वाटचाल’ या विषयावर परिसंवाद पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सरहद (पुणे), महाराष्ट्र सदन आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
भारतीय नागरी लेखा सेवेतील वरिष्ठ अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांनी घर आणि कार्यालय यामधील समतोल राखण्याच्या सामाजिक अपेक्षांवर भाष्य केले. महिलांनी अपराधीपणाची भावना बाजूला ठेवून मुलांना आपल्या कार्यपद्धतीची ओळख करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
भारतीय विदेश सेवेतील अधिकारी वल्लारी गायकवाड यांनी मेक्सिको आणि स्पेनमधील अनुभव सांगत एआय आणि सायबर डिप्लोमसीसारख्या आधुनिक आव्हानांवर प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना ‘व्हॅल्यू ॲड’ करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
नागरी संरक्षण संचालनालयातील अधिकारी राजेश्वरी कोरी यांनी नौदलातील आपल्या साहसी प्रवासाचा उलगडा करत सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला. संकट काळात महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली फुले आणि निवेदिता खांडेकर यांनी केले. उपस्थितांनी या चर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0