21व्या राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक; एपी सांघिक प्रकारात उल्लेखनीय कामगिरी
उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या एपी सांघिक संघाने कांस्यपदक पटकावले. सारंग शेटकर, जानवी जाधव, विधी पाटील आणि किरा पुरंदरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.
नाशिक ब्यूरो
रुद्रपूर (उत्तराखंड) | उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या एपी (Épée) सांघिक संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. 28 मे रोजी पार पडलेल्या एपी सांघिक प्रकारातील स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
उपांत्य फेरीत हरियाणाविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राचा पराभव झाला. मात्र त्यानंतरच्या लढतीत उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
महाराष्ट्राच्या संघात नाशिकचा सारंग शेटकर, लातूरची जानवी जाधव, पुण्याची विधी पाटील आणि मुंबईची किरा पुरंदरे यांचा समावेश होता. या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या अंतिम निकालानुसार हरियाणा संघाने सुवर्णपदक, पंजाबने रौप्यपदक तर महाराष्ट्र आणि मणिपूर यांनी संयुक्तपणे कांस्यपदक मिळवले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रशिक्षक अजिंक्य दुधारे, स्वामी, श्वेता चंडालिया, दत्ता गलाले, जय शर्मा आणि राजू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, खजिनदार राजकुमार सोमवंशी आणि राजू शिंदे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या युवा तलवारबाजांनी केलेली ही कामगिरी राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0