खरीप हंगाम 2026 साठी पीकस्पर्धा जाहीर; 11 पिकांसाठी शेतकऱ्यांना संधी
कृषी विभागाने खरीप हंगाम 2026 साठी भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीनसह 11 पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना 31 जुलै व 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विजेत्यांची निवड होणार आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव:
कोल्हापूर कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2026 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 300 रुपये तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना 150 रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठीही सहभाग घेता येणार आहे.
भात पिकासाठी किमान 20 आर क्षेत्रावर तर इतर पिकांसाठी किमान 40 आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे जिल्हा आणि राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्जासोबत 7/12 उतारा, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी गटासाठी), क्षेत्राचा नकाशा, बँक पासबुकची प्रत आणि प्रवेश शुल्क भरल्याचे चलन जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0