शिक्षणातून समाज परिवर्तन घडविणारे युगपुरुष : छत्रपती शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीचा प्रेरणादायी वारसा
छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी वसतिगृह चळवळ उभी केली. शिक्षण, आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण या उपाययोजनांमुळे सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय निर्माण झाला. आजही शाहू महाराजांनी सुरू केलेली वसतिगृहे गरजू, गरीब आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व आर्थिक उन्नतीची केंद्रे म्हणून कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित, गरीब आणि बहुजन घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारलेली वसतिगृह चळवळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे अनेक वसतिगृहे उभी राहिली, शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांच्या स्थापनेला चालना मिळाली.
शाहू महाराजांनी स्थापन केलेली अनेक वसतिगृहे आजही ताठ मानेने कार्यरत आहेत. काळाच्या ओघात जाती-पातीची बंधने कमी झाली असून, आज या वसतिगृहांमध्ये सर्व समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृहे आजही सामाजिक, आर्थिक आणि मानसिक बळ देणारी केंद्रे ठरत आहेत.
वसतिगृह चळवळीच्या माध्यमातून शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणासोबतच आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण यांसारख्या लोककल्याणकारी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली.
शिक्षण हेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रभावी साधन आहे, हा विचार शाहू महाराजांनी कृतीतून सिद्ध केला. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविणारे युगपुरुष म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आणि अनुकरणीय मानले जाते.
– प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0