मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी होणार उपयोग; नितेश राणेंची माहिती
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन अत्याधुनिक बंदर व्यवस्थापन, कंटेनर हाताळणी, डिजिटल तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा अभ्यास केला. महाराष्ट्रातील बंदरांचा जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी मुंद्रा पोर्टच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई प्रतिनिधी : सागर ठोकळे
मुंबई | दि. १ जुलै २०२६ : महाराष्ट्रातील बंदरांचा आधुनिक, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाचा विकास करण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुजरातमधील देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील अत्याधुनिक सुविधा, व्यवस्थापन प्रणाली आणि पायाभूत विकासकामांची पाहणी केली.
या अभ्यास दौऱ्यानंतर बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, मुंद्रा पोर्टवरील आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स प्रणालीचा उपयोग महाराष्ट्रातील बंदरांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील बंदरे अधिक स्पर्धात्मक, सक्षम आणि जागतिक दर्जाची बनतील.
दौऱ्यादरम्यान त्यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, पूर्ण यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, साठवण सुविधा, लॉजिस्टिक्स नेटवर्क तसेच जहाजांच्या जलद हालचालीसाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली. मुंद्रा पोर्टच्या कार्यक्षम नियोजनामुळे आणि वेगवान सेवेमुळे देशाच्या आर्थिक विकासात या बंदराचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी यांच्यासोबत महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी गुंतवणूक आणि भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची भूमिका या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत महाराष्ट्रातील बंदरांची मालवाहतूक क्षमता वाढविणे, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी अधिक सक्षम करणे तसेच बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि नैसर्गिक बंदरांची क्षमता लक्षात घेता त्यांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविल्या जातील.
त्यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवी दिशा मिळणार असून आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या आधारे राज्यातील बंदरे अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0